Monday, February 1, 2021

चिंतन नक्की कुणी करायचंय?



गेल्या वर्षभरात किमान डझनभर वेळा भाजपकडून राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या वल्गना किंवा घोषणा किंवा इशारे देण्यात आले. त्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून अगदी ज्यांच्याकडे कोणत्याही सदनाची उमेदवारी नाही असे सदैव शिवसेनेवर सदैव टीकाच करत राहणारे किरीट सोमय्या यांच्यापर्यंत झाडून सगळ्या भाजप नेत्यांचा समावेश होता. भाजपचे काही केंद्रीय मंत्रीदेखील यामध्ये मागे राहिले नाही. त्यामुळे राज्यातल्या जनतेच्या मनातदेखील महाविकास आघाडीचं सरकार कधीही पडू शकतं, अशीच धारणा निर्माण झाली होती. भाजपच्या काही नेत्यांना तर सत्तेत बसून मंत्रीपदाची देखील स्वप्नं पडू लागली होती. मात्र, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे निकाल मात्र या धारणांना जबरदस्त धक्का देणार्‍या ठरल्या आहेत. हा धक्का फक्त मतदारांसाठी, भाजपसाठी किंवा शिवसेनेसाठीच नाही तर सत्तेतल्या सर्वच पक्षांसाठी आहे. त्यामुळे सगळ्यांनीच या निकालांचे अन्वयार्थ लावून त्यावरून आत्मचिंतन करणं गरचेचं आहे. अर्थात, कुणासाठी ते इशारा देणारं ठरेल आणि कुणासाठी ते आत्मविश्वास वाढवणारं ठरेल, हे ज्या-त्या पक्षाच्या धोरणांवर अवलंबून असणार आहे.

राज्यात धुळे नंदुरबार या विधान परिषदेच्या जागेची पोटनिवडणूक, 3 पदवीधर मतदारसंघ आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला जबरदस्त झटका बसला असून त्यांना एकमेव जागा जिंकता आलेली आहे. मात्र, तिही काँग्रेसमधून आयात करण्यात आलेल्या उमेदवाराच्या जोरावर भाजपनं जिंकलेली आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून लढवलेल्या या निवडणुकीत भाजपला अक्षरश: धोबीपछाड दिली आहे. त्यामुळे साहजिकच सत्तेतल्या तीनही पक्षांसाठी ही निवडणूक आत्मविश्वास वाढवणारी ठरली, तर विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, त्याचं सविस्तर निरीक्षण आणि अंतरप्रवाह पाहिले जाणं आवश्यक आहे. त्या त्या पक्षांकडून ते काम आता होईलच.

या सगळ्याला सुरुवात झाली धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीपासून. गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसच्या तिकिटावर हा मतदारसंघ बांधणार्‍या अमरिश पटेल यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सुरू असलेल्या मेगाभरतीमध्ये भाजपच्या हाती लागलेला उत्तर महाराष्ट्रातला हा मोठा नेता. धुळे-नंदुरबारमधून सलग 4 वेळा विधानसभा आमदार आणि सलग दोन वेळा विधान परिषद आमदार राहिलेले अमरिश पटेल याही वेळी परिषदेवर निवडून जातील, हे निश्चित मानलं जात होतं. निकाल देखील तसाच लागला. मात्र, कागदोपत्री जरी ही जागा भाजपने जिंकली असली, तरी हा खरा विजय अमरिश पटेल यांचाच मानला गेला. त्यामुळे धुळे-नंदुरबारमध्ये भाजपच्या हाती फारसं काही लागलं नाही. मात्र, तरीदेखील इतर 5 जागांचे निकाल हाती येण्याआधीच भाजपनं ‘ही तर विजयाची शुभ सुरुवात’, अशा थाटात या निकालाचं स्वागत केलं. पण हा भाजपसाठी उतावीळपणाच ठरला!

शुक्रवारी सकाळपासून जसजसे इतर जागांचे निकाल हाती येऊ लागले, तसतसा भाजपच्या दाव्यांमधला आणि त्यांच्या फसव्या आत्मविश्वासामधला फोलपणा उघडा पडू लागला. यात सगळ्यात मोठा धक्का भाजपसाठी ठरला तो नागपूरचा. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय (आणि त्यातही मोठ्या संख्येने संघाचे तरूण कार्यकर्ते!) असं सगळं असल्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून नागपूर हा भाजपचा गड राहिला आहे. इथल्या पदवीधर मतदारसंघावर भाजपचा अघोषित हक्कच होता असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. पण फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या संदीप जोशींनाही आयत्या मतदारसंघावर ताव मारता आला नाही. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी तब्बल 18 हजार 710 मतांनी त्यांचा पराभव केला.

भाजपसाठी दुसरा धक्का ठरला तो पुणे पदवीधर मतदारसंघाचा. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि खुद्द विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला झालेला हा मतदारसंघ गृहीत धरला गेला. पण इथे महाविकास आघाडीतला दुसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरूण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुखांना 50 हजारांहून जास्त मतांनी पराभूत केलं. पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसच्या जयंत आसगावकरांनी विजय मिळवला. इथे तर भाजपचे जितेंद्र पवार थेट तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. औरंगाबादमध्ये देखील राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. तिथे सलग दोन टर्म पदवीधर आमदार राहिलेले सतीश चव्हाण विजयाची हॅट्ट्रिक करतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या भाजपच्या शिरीष बोराळकरांना तब्बल 57 हजारांहून जास्त मतांनी पराभव पत्करावा लागेल, अशी अपेक्षा खुद्द राष्ट्रवादीलादेखील नसावी! अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विधान परिषदेवर शिक्षक आमदार म्हणून निवडून गेले आहेत.

खरंतर या निवडणुकांच्या आधी ज्या पद्धतीने भाजपकडून पाचही मतदारसंघ प्रतिष्ठेचे करण्यात आले होते, ते पाहाता निकाल भाजपच्या बाजूने किमान 5-1 असा लागेल, असा राजकीय धुरिणांचा होरा होता. खुद्द महाविकास आघाडीमध्ये देखील इतका थेट आणि सरळ विजय मिळेल, अशा अंदाज नसावा. या निवडणुकांनंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेने ते करण्याची गरज जरी असली, तर त्याहून जास्त गरज ती भाजपला आहे हे मात्र ते सांगायचं विसरले किंवा त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं. कारण राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आणल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीसांना सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे राज्यात तीन पक्षांचं सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. दुखापतीनंतर पुन्हा खेळायला आलेल्या फलंदाजाला जशी चांगल्या खेळीने सुरुवात करण्याची आशा आणि अपेक्षा असते, तशीच ती भाजपला देखील होती. पण त्या प्रमाणात सराव करण्यास मात्र भाजप सपशेल अपयशी ठरली, हे खुद्द त्यांच्याच पक्षाच्या दिग्गजांनी मान्य केलं हे बरंच झालं. या निवडणुकीत विरोधकांचा अंदाज घेणे आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करणे यामध्ये भाजप कमी पडल्याची कबुलीच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांसाठी या निवडणुकीतून दुहेरी धक्का बसला. आधी 105 आमदार असूनही सत्ता स्थापन करण्यात अपयश आलेलं असताना आता बालेकिल्ला आणि स्वत:चा हक्काचा मतदारसंघ असलेल्या नागपूर गडदेखील गमावल्यामुळे फडणवीसांना आता अधिक तीव्र पक्षांतर्गत विरोधक आणि नाराजीचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या आणि राज्यातले भाजपचे दुसर्‍या क्रमांकाचे महत्त्वाचे नेते असलेल्या चंद्रकांत पाटील यांनादेखील त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे मतदारसंघाची जागा राखता आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीनं या विजयातून महाराष्ट्र भाजपच्या दोन्ही मर्मस्थळांवर आघात केल्याचं म्हटलं तर वावगं ठरू नये!

दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही विन-विन परिस्थिती ठरली आहे. राज्याच्या सत्तेत दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर असूनही त्यांच्या उमेदवारांनी प्रमुख विरोधक असलेल्या भाजपला धूळ चारली. मात्र, या निकालांमधून सत्ताधार्‍यांना देखील हे पक्क कळून चुकलं आहे की भाजपसारख्या कडव्या आणि ताकदवान विरोधी पक्षासमोर तिघं एकत्र राहिले, तरच पाडाव शक्य होऊ शकतो. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं उघड आव्हान केलं. अर्थात, आघाडी म्हणूनच तिन्ही पक्ष निवडणूक लढवत असल्यामुळे या आव्हानाला तसा काही अर्थ उरला नसला, तरी त्यांनी देखील या निकालांचा अर्थच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सूचित केलाय!

या फक्त राज्यातल्या 5 मतदारसंघातल्या आणि त्याही पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी निवडून दिलेल्या जागा जरी असल्या, तरी राज्यातला सुशिक्षित तरूण मतदार नक्की कोणत्या राजकीय वैचारिक घुसळणीतून सध्या जातोय, त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण नक्कीच ठरावं. कोरोना काळात भाजपनं सत्ताधार्‍यांविरोधात उडवलेले टीकेचे बार राज्यातल्या सुशिक्षित मतदारांनी फुसके ठरवले आहेत. त्यामुळे फक्त राजकीय घोडेबाजाराच्या जीवावर सत्तेचे फासे फिरवून ‘आम्ही पुन्हा येऊ’च्या वल्गना करणार्‍या विरोधकांना जनतेमधला, युवा वर्गातला आपला जम ढळू शकतो, याची भीती नक्कीच निर्माण झाली आहे. पण त्यासोबतच, भाजपचा जम उखडून पुन्हा कमबॅक करण्याची संधी महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांसमोर आता दिसू लागली आहे. आता सत्ताधारी तिचं संधी समजून सोनं करणार की फक्त लक बाय चान्स समजून पुढे निघणार, हे मात्र त्या त्या पक्षाच्या धोरणावर अवलंबून असेल!

हा कोरोना किती लाच घेतो हो?

चहाच्या ठेल्याच्या उद्घाटनासाठी देखील माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जातात!

सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे… कोरोनाच्या अगदी सुरुवातीपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांपर्यंत झाडून सगळ्यांनी कोरोनापासून बचावासाठी या त्रिसूत्रीचा कंठरवाने उल्लेख केला आहे. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही, तोपर्यंत याच त्रिसूत्रीच्या जोरावर कोरोनाचा पराभव शक्य आहे हे वारंवार आणि वेळोवेळी जनतेच्या मानवर ठसवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे कोरोनाची लस किंवा ही त्रिसूत्री, याशिवाय कोरोनापासून वाचण्याचा तिसरा कोणताही मार्ग किंवा उपाय नाही, याबद्दल सामान्यांच्या मनात अजिबात शंका उरली नाही. प्रत्येकजण एक तर लसीची वाट पाहू लागला किंवा त्रिसूत्रीचं पालन करण्याचा प्रयत्न करू लागला. सरकारकडूनही आपत्कालीन कायद्यांतर्गत कारवाईची भीती घातली जाऊ लागली. पण या दोन्ही उपायांखेरीज, कोरोनाला लांब ठेवण्याचा अजून एक उपाय आहे हे सामान्यांपासून लपवलं गेलं आहे. त्याचा साक्षात्कार आता सामान्यांना होऊ लागला आहे. कारण हा कोरोना लाचखोर आहे!

हे वाचून खरंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय भलतंच. एक डोळ्यांनाही न दिसणारा विषाणू लाच कशी घेऊ शकेल? पण सत्ताधारी, विरोधक, प्रशासक अशा सगळ्याच नेतेमंडळी आणि अधिकार्‍यांच्या वर्तनातून तरी हेच दिसून येत आहे. कोरोना जर लाच घेत नसता, तर या मंडळींचे मोठमोठाले भारंभार गर्दीचे कार्यक्रम बिनबोभाटपणे पार पडते ना! त्यामुळे या सर्व मंडळींनी कोरोनाला नक्कीच लाच दिली असणार! त्यामुळेच यांनी सगळे नियम मोडले जरी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जरी, मास्क घालणं टाळलं जरी किंवा वेळोवेळी हात धुण्याचा त्यांना विसर पडला जरी, तरी कोरोना काही त्यांच्या जवळदेखील फिरकायचा नाही, याची त्यांना निश्चितपणे खात्री असणार!

२२ डिसेंबरपासून राज्यभरातल्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला. त्याच्याच दोन दिवस आधी पुण्यात एक जंगी विवाह सोहळा पार पडला. आणि हे लग्न होतं भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं. पुण्याच्या शुभारंभ लॉन्समध्ये संध्याकाळच्या वेळी हा सोहळा पार पडला. खरंतर सरकारी नियमानुसार लग्नसमारंभात जास्तीत जास्त २०० लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून. सामान्य माणसांच्या लग्नकार्यात या नियमांचे दाखले देऊन कारवाया केल्या जात असताना आणि अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल केले जात असताना केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या एका आमदाराचा असा जंगी सोहळा अगदी बिनबोभाटपणे पार पडू शकतो, हे सगळ्या जनतेनं पाहिलं.

विशेष म्हणजे या सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हजर होते. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, हर्षवर्धन पाटील, गिरीश बापट, सुभाष देशमुख, निलेश राणे असे अनेक भाजपचे ज्येष्ठ-श्रेष्ठ-वरीष्ठ नेतेमंडळी हजर होते. कोरोनावरच्या उपाययोजनांबद्दल राज्य सरकार किती बेजबाबदारपणे वागत आहे या मुद्द्यावरून लागोपाठ पत्रकार परिषदा घेऊन टीका करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या लग्नात मास्क न लावता गर्दीमध्ये वधूवरांसोबत फोटो काढत अत्यंत ’जबाबदार’ वर्तन करताना दिसले!

बरं आपण अशा पद्धतीने परवानगी नसताना आपण गर्दी करून, सगळ्या नियमांची दारू करून फटाक्यांमध्ये उडवून दिलेली असताना त्याचं जाहीर प्रमोशन करण्यात देखील ही मंडळी मागे हटली नाही. त्यामुळे त्यांनी तोडलेल्या नियमांचे पुरावे त्यांनी स्वत:च ट्वीटरवर टाकले आहेत. लग्नानंतर चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी विनामास्क काढलेले फोटोच ट्वीटरवर शेअर केले आहेत!

विरोधकांनी अशा प्रकारे ‘भरीव’ लग्नसोहळ्यामध्ये जाहीरपणे कोरोनाला फुटबॉलसारखं लाथेनं उडवून लावल्यानंतर सत्ताधार्‍यांकडून किमान शहाणपणाची अपेक्षा होती. कारण शेवटी कोरोना काळात सामान्य जनतेने पाळायचे एकूण एक नियम सत्ताधार्‍यांनीच बनवले होते. त्यामुळे त्यांच्याकडून ‘जबाबदार’ वर्तन पाळलं जाईल असं वाटत असतानाच नाशिकमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा याहून जंगी लग्नसोहळा शहरातल्या बालाजी लॉन्समध्ये 4 जानेवारीला पार पडला. हे आमदार होते दिलीप बनकर. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याच गोटातले समजले जाणार्‍या दिलीप बनकर यांचं लग्न म्हटल्यावर अजित पवारांची त्यासाठी उपस्थिती अनिवार्यच होती. त्यांच्यासोबत नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकप्रतिनिधी मंडळी या लग्नाच्या गर्दीत शक्य तितकी भर घालण्यासाठी हजर होती. इतकंच नाही, तर ज्यांच्यावर सरकारचे निर्णय लागू करण्याची जबाबदारी असते, ते मोठमोठे प्रशासकीय अधिकारी देखील या लग्नाला ‘जबाबदारी’ने हजर होते! सगळ्या विशेष बाब म्हणजे हजारोंच्या गर्दीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्यावर नंतर राम सातपुतेंच्या लग्नाचे फोटो लाईक आणि शेअर करणार्‍या भाजपने टीका केली! नियम मोडण्यात देखील ‘तुम्ही शेर तर आम्ही सव्वाशेर’, असंच सत्ताधार्‍यांनी ठरवलं होतं की काय? असा प्रश्न या लग्नाच्या निमित्ताने नाशिककरांना पडला असावा!

या लग्नाच्या ५ ते ६ दिवस आधीच नाशिक मध्यच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर एका समस्येबाबत पोलीस स्थानकावर १० ते १२ महिलांना घेऊन गर्दी केली म्हणून त्यांच्याविरोधात आपातकालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण तोच कायदा या लग्नासाठी लागू करण्यासाठी मात्र नाशिकचे पोलीस आयुक्त आणि नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्यामध्ये टेनिस कोर्टचा सामना रंगला आहे. कारवाई तर सोडा, पण या घटनेवर भाष्य कोण करणार, यावरून देखोली दोघांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे. पुण्यात झालेल्या लग्नसोहळ्यावर पुणेकरांनीच आवाज उठवल्यानंतर तातडीने पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले. पण लग्नाला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.

या दोन घटना फक्त प्रातिनिधिक म्हणता येतील अशा आहेत. आपल्या आसपास अजूनही बड्या धेंडांची प्रचंड गर्दी असलेली लग्नकार्य, पक्षप्रवेशाचे कार्यक्रम, निवडणुकांच्या प्रचारसभा, जाहीर सभा आणि इतर अनेक कार्यक्रम बिनबोभाटपणे पार पडत आहेत. मात्र, केवळ काही ‘कनेक्शन्स’च्या जोरावर नियम पायदळी तुडवून असे कार्यक्रम घेण्याचं धारिष्ठ्य या नेतेमंडळी आणि त्यांच्या लागेबांध्यांमध्ये येत आहे. पण दुसरीकडे सामान्यांना मात्र कायम मानेवर नियमांची टांगती तलवार ठेऊनच वावरावं लागत आहे. त्यामुळे इतर बाबतीत कायम पडणारा प्रश्न कोरोनासारख्या महाभयंकर जीवघेण्या विषाणूचा सामना करताना देखील आता पडू लागला आहे. सर्व नियम आणि बंधनं फक्त सामान्यांसाठीच आहेत का? किंवा सर्व नियम आणि बंधनं फक्त सामान्यांसाठीच का आहेत? आणि या दोन्ही प्रश्नांसाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसोबतच प्रशासन देखील तितकंच उत्तरदायी आहे. दिल्लीत झालेल्या तबलिगींच्या कार्यक्रमातून कोरोना पसरल्याचा कांगावा करत रान उठवणारी मंडळी आता का चिडीचूप बसली आहेत? मुंबईत सर्वांसाठी लोकल सुरू न करण्यासाठी गर्दीमुळे कोरोना वाढण्याचं कारण देणारे सत्ताधारी अशा कार्यक्रमांचा पत्ता कोरोनाला माहितीच नसतो अशा आविर्भावात का वागत आहेत? कोरोनावरून सरकारचा पिच्छा पुरवणारे विरोधक अशा कार्यक्रमांमध्ये हारतुरे आणि गळाभेट का स्वीकारत आहेत?

खरंतर सामान्यांना गृहीत धरण्याची वृत्ती काही आजची नाही. तसंच, एका विशिष्ट वर्गाला नियमांमधून मोकळीक देण्याचे प्रकार देखील नवे नाहीत. पण किमान कोरोनासारख्या भीषण प्रकाराचं गांभीर्य ठेऊन तरी या मंडळींनी जबाबदारीचं भान ठेवायला हवं. आणि अशा बेजबाबदार वर्तनावर करडी नजर ठेऊन त्याला वेळीच आवर घालण्याच्या कर्तव्याचा प्रशासनाला विसर पडता कामा नये. तो जर पडला, तर पैशाने सारंकाही विकत घेता येतं, या सूत्रावरचा सामान्यांचा भरवसा अधिकच दृढ होईल. आणि या बड्या धेंडांनी कोरोनालाही लाच देऊन खरेदी केलंय की काय? असा प्रश्न ते विचारू लागतील! त्याचंही उत्तर मिळणार नाही, हेही गृहीतच!


काँग्रेसची ‘शिवसेना स्टाईल’!




‘आम्ही ठणकावून सांगतो’…‘भान बाळगावे’…‘आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही’…‘कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही’… काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याच मित्रपक्षाला सुनावलेले हे खडे बोल! खरंतर हे किंवा अशा प्रकारचे आक्रमक शब्द कायम शिवसेना नेत्यांच्या, पदाधिकार्‍यांच्या, कार्यकर्त्यांच्या बोलण्यात ऐकण्याची महाराष्ट्राच्या जनतेला सवय लागली आहे. त्यानंतर हा वसा कौटुंबिक वारशामधून राज ठाकरेंकडेही आला. त्यामुळे त्यांच्याही भाषणांमध्ये अशा प्रकारचा आक्रमकपण दिसू लागला. पण महाराष्ट्र काँग्रेसकडून गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारचा आक्रमकपणा दाखवल्याचं दिसत नव्हतं. विरोधकांना ‘ठणकावून’ सांगण्याच्या भानगडीत काँग्रेसजन फारसे पडत नसत. त्यापेक्षा रीतसर निषेध करण्यावरच त्यांचा भर असे. पण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र काँग्रेसकडून ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली जाऊ लागली आहे, आणि विशेष म्हणजे आपल्याच सत्तेतल्या मित्रपक्षाविरूद्ध ही आक्रमक भूमिका घेतली जाऊ लागल्यामुळे हा माध्यमांसाठी चर्चेचा, सत्ताधार्‍यांसाठी चिंतेचा आणि भाजपसाठी राजकारणाचा विषय झाला आहे.

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं, असा अट्टाहास शिवसेनेनं लावून धरला आहे. नव्हे, सुरुवातीपासूनच शिवसेनेची तीच भूमिका राहिली आहे. अगदी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याआधीपासून. त्यामुळे काँग्रेसला शिवसेनेची ही भूमिका माहिती नसण्याचं काहीही कारण नाही. शिवाय इतकी वर्षे औरंगाबादमध्ये याच मुद्यावरून राजकारण पेटवणार्‍या शिवसेनेसमोर काँग्रेसनंही दोन हात केलेच आहेत. त्यामुळे आत्ताच हा मुद्दा का पेटवला जातोय? यासोबतच काँग्रेसकडून आत्ताच या मुद्याचं राजकारण का केलं जातंय? हा देखील मुद्दा चर्चेचा ठरू लागला आहे. विशेषत: बाळासाहेब थोरात यांच्याकडून या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली जाऊ लागली आहे. कधी ट्वीटरच्या माध्यमातून तर कधी थेट प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेला विरोध करण्यात बाळासाहेब थोरात अजिबात मागे हटत नाहीत.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिले ६ ते ७ महिने शिवसेनेसोबत शांततेत संसार करणार्‍या काँग्रेसनं पहिला आरोप केला तो काँग्रेसला सत्तेत समान स्थान आणि निर्णय प्रक्रियेत योग्य महत्त्व मिळत नसल्याचा. तेव्हा देखील बाळासाहेब थोरातांनी थेट प्रसार माध्यमांमध्येच हे आरोप करून मुख्यमंत्री आणि सत्ताधार्‍यांना अडचणीत आणलं होतं. हे प्रकरण तर थेट दिल्ली हायकमांडपर्यंत देखील पोहोचलं होतं. आता पुन्हा एकदा काँग्रेसनं शिवसेनेच्या विरुद्ध भूमिका घेतली असून यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचीदेखील साथ आहे!

बाळासाहेब थोरातांनी यावेळी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून खुलं पत्रच त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये भाजपला कानपिचक्या देताना त्यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. ‘केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणार्‍यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही’, अशा शब्दात बाळासाहेब थोरातांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

बाळासाहेब थोरातांनी लिहिलेलं हे खुलं पत्र काही क्षणांसाठी कुणाला ‘सामना’चा अग्रलेख वाटल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही! कारण यातली भाषा ही काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या राजकीय पद्धतीला साधर्म्य सांगणारी वाटत नाही. पण मग काँग्रेस आत्ताच इतकी आक्रमक का झालीये? की औरंगाबाद पालिका निवडणुका आणि मुंबई पालिकेसोबतच राज्यातील इतर पालिका निवडणुकांमध्ये आपलं वजन आणि व्होटबँक वाढवण्यासाठी काँग्रेसकडून अशा प्रकारे विरोध केला जातोय? या प्रश्नावर व्यापक चर्चा होऊ शकते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे एखाद्या शहराचं नाव धार्मिक किंवा ऐतिहासिक संदर्भातले दाखले देऊन बदलणं हे काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर सर्वच प्रकारच्या मतदारांशी जुळवून घेताना परवडणार नाही. विशेषत: भाजपच्या विरोधात काँग्रेसला आपला ‘धर्मनिरपेक्ष’ चेहरा जपणं नितांत आवश्यक आहे. अशात काँग्रेसनं या मुद्याला विरोध करणं साहजिक वाटू शकतं. पण त्याचसोबत अशा मुद्यांमुळे सत्तेतून बाहेर पडण्यापर्यंत ताणतणाव निर्माण होऊ देणं देखील काँग्रेसला नक्कीच परवडणारं नाही. कारण सत्तेत सहभागी असल्यामुळेच काँग्रेसला राज्यात पुन्हा हातपाय पसरण्याची आणि पक्ष वाढवण्याची चांगली संधी मिळू शकणार आहे. हे काँग्रेसच्या धुरिणांना माहिती नसावं, असं अजिबात वाटण्याचं कारण नाही.

बाळासाहेब थोरात गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेविरोधात जाहीर भूमिका घेऊन आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची निवडणूक देखील कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काँग्रेसला राज्यामध्ये आता आक्रमक चेहरा हवा आहे. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील निवड होताच ‘२०२२ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार’ असल्याची घोषणा करून टाकली आहे. त्यामुळे राज्यात आक्रमकपणे पक्षवाढ करण्यासाठी काँग्रेसकडून पावलं टाकली जात आहेत हे स्पष्ट आहे. आणि त्यात चुकीचंही काही नाही. कारण आघाडीत असला, तरी प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:चा विस्तार करण्याचा नक्कीच अधिकार आहे. मात्र, आपण घेतलेली भूमिका आपल्यालाच मारक ठरणार तर नाही ना, याचा देखील काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वानं विचार करणं आवश्यक आहे. बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातला काँग्रेसचा आक्रमक चेहरा होण्याचा प्रयत्न करत असले, तरी यातून हातची सत्ता गेली, तर त्याचे राजकीय परिणाम काँग्रेसला भोगावे लागू शकतात. विशेषत: राज्यात काँग्रेसचे इतरही अनेक आक्रमक नेते असताना या मुद्यावरून फक्त थोरातच अशा प्रकारे आक्रमक झालेले दिसणं नक्कीच खटकणारं आहे!

खरंतर औरंगाबादचा विकास हा विषय कुणीही नाकारू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये औरंगाबादकरांनी सर्वच पक्षांना सत्ता देऊन पाहिली आहे. आणि त्या सर्वांनी त्यांचा भ्रमनिरासच केला आहे. सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी औरंगाबादमधून निवडून विधिमंडळावर आणि देशाच्या संसदेतदेखील गेले आहेत. मात्र, तरीदेखील औरंगाबादकरांना मात्र अपेक्षित विकासानं हुलकावणीच दिली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी केलेली औरंगाबादच्या विकासाची मागणी योग्यच आहे. पण त्यासाठी नामांतराला विरोध करणं तर्काला पटत नाही. खरंतर इथे थोरातांनी काँग्रेसच्या देशपातळीवरच्या प्रतिमेला आणि विचारसरणीला ते पटत नाही म्हणून विरोध करतोय, इतकंच सांगितलं असतं, तरी चाललं असतं. पण त्याहीपुढे जाऊन त्यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी औरंगाबादमध्ये विकास होत नसताना नाव बदलण्याऐवजी विकासावर लक्ष केंद्रित करावं, असा सल्ला दिला. आता औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं तर तिथे विकासच होणार नाही का? असा प्रश्न कुणी बाळासाहेबांना विचारला, तर त्याचं त्यांच्याकडे काय उत्तर असेल?

खरंतर, बाळासाहेब थोरातांचा असा आक्रमक विरोध पाहिला की भाजप-शिवसेनेची सत्ता असताना शिवसेना ज्या पद्धतीने विरोध करत होती, त्याची आठवण होते. खुद्द विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे राज्यात युतीचं सरकार असताना प्रत्यक्ष किंवा सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर आणि भाजपच्या निर्णयांवर थेट प्रहार करताना दिसत होते. तेव्हाही शिवसेना सत्तेत असली, तरी जनतेच्या भल्याची आणि विकासाची भूमिका मांडत असल्याचं सांगून आपल्याच सरकारवर टीका करत होती. आता शिवसेनेलाच काँग्रेसच्या रुपानं त्यांच्याच भूमिकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही ‘शिवसेना स्टाईल’ आता शिवसेनेचं नेतृत्व कसं हाताळतं, यावर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून असेल, असं म्हणायला हरकत नाही!

Tuesday, August 4, 2020

कोरोनाहून भयंकर पुरुषी विकृतीचा विषाणू!



गेल्या ७ महिन्यांपासून जगभरात आणि ५ महिन्यांपासून भारतात कोरोना ठाण मांडून बसला आहे. कोरोनाचा कुणामध्येही भेदभाव करत नाही असं म्हणतात. गरीब, श्रीमंत, शहरी, ग्रामीण, शिक्षित, अशिक्षित, लहान, मोठे, वृद्ध, स्त्री, पुरूष अशा सर्वांनाच कोरोना होण्याची सारखीच भिती आहे. त्यातही काही वयोगट फक्त प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनापासून जास्त सुरक्षित असल्याचा दावा जरी केला जात असला, तरी आजपर्यंत जगभरात सापडलेल्या कोट्यवधी कोरोना रुग्णांमध्ये या सर्वच गटातल्या रुग्णांचा समावेश आहे. पण असं जरी असलं, तरी समाजातल्या काही घटकांसाठी कोरोनाचा विषाणू जास्त घातक ठरतो आहे. स्त्रियांना पुरुषांपासून असलेला धोका इतर सामान्य परिस्थितीपेक्षा कोरोना काळात वाढलाय की काय, असंच गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांवरून वाटू लागलं आहे. राजकीय नेतेमंडळींनी यावर काय भूमिका मांडली हा भाग आपण काही काळासाठी बाजूला ठेऊयात. कारण त्या भूमिका किती प्रामाणिक आहेत, यावरच बहुतेक जनतेचा विश्वास नाही! पण यावर या समाजाचा जवळपास ५० टक्के घटक असलेल्या महिला वर्गामध्ये मात्र आता भितीची भावना निर्माण झाली आहे. आणि त्यासाठी कोरोना नसून काही पुरुषी वासनांध मेंदू कारणीभूत झाले आहेत. आणि ते कोरोनापेक्षाही भयानक आहेत!

प्रत्यक्ष कोरोनाची लागण झाल्यामुळे नव्हे, तर त्यासाठी रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये किंवा कोरोना आयसोलेशनमध्ये दाखल झाल्यामुळे महिलांना आता जास्त धोका वाटू लागला आहे. त्याला कारण गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या या घटना. अगदी अलिकडचं उदाहरण घ्यायचं झालं, तर अमरावतीच्या बडनेरामध्ये घडलेली एक किळसवाणी आणि मानसिक विकृती दर्शवणारी घटना. (दुर्दैवाने) महिलांचा विनयभंग, लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार या रोजच्या रोज घडणाऱ्या घटनांसाठी सामान्य मन कोडगं झालं आहे. हे कानांना ऐकायला कितीही कटू वाटत असलं, तरी सत्य आहे. पण अमरावतीमध्ये घडलेली घटना किंवा त्यासारख्याच घडलेल्या इतर घटना या बाबतीत वेगळ्या आहेत. कोरोनाच्या उपचारांसाठी किंवा कोरोनामुळे संशयित असलेल्या महिला रुग्ण किंवा महिला संशयितांना त्यांच्या जीवितापेक्षाही त्यांच्या शीलाची काळजी जास्त वाटू लागणं हे या सरकारचं आणि प्रशासनाचं अपयश आहे असं म्हटलं तर त्यात काहीही वावगं ठरणार नाही.

Image Source - TOI


अमरावतीच्या बडनेरा भागात असणाऱ्या मोदी हॉस्पिटलमध्ये एका तरूणीचा कोविड चाचणीसाठी घसा आणि नाकातल्या स्वॅबसोबतच गुप्तांगातला देखील स्वॅब घेतला गेला. कोरोना चाचणीसाठी फक्त घसा आणि नाकातलाच स्वॅब घ्यावा लागतो हे समजल्यानंतर तिने यासंदर्भात तक्रार केली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. संबधित लॅब टेक्निशियनवर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली हा भाग वेगळा. मात्र, या प्रकारामधून काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि एक समाज म्हणून त्या प्रश्नांचा विचार करण्यासोबतच त्यावर उत्तरं शोधण्यासाठी आणि उत्तरं देण्यासाठीही आपण बांधील आहोत.

हा सगळा प्रकार घडला, ती पीडिता एका प्रतिष्ठित व्यापारी प्रतिष्ठानमध्ये काम करते. त्यामुळे साहजिकच शिक्षण, जाणीव किंवा जागृतीच्या स्तरावर ती अज्ञानी नक्कीच नव्हती. मात्र, अशा तरुणीसोबत देखील असा प्रकार घडला असेल, तर ग्रामीण भागात जिथे शिक्षण, जागृती या सगळ्याच बाबतीत आनंद आहे, अशा ठिकाणी चाचणीसाठी किंवा तपासणीसाठी गेलेल्या महिलांच्या बाबतीत काय घडत असेल, याचा अंदाज लावण्यासाठी मन धजावत नाही. अर्थात, तसं घडलंच असेल, असा जरी आपल्याला दावा करता येत नसला, तरी तसं काही कुठे घडलं नसेलच, असा देखील दावा कुणी छातीठोकपणे करू शकणार नाही. किमान बडनेराच्या घटनेनंतर तरी तसा दावा कुणी करू नये. याशिवाय सरकारमान्य लॅबमध्ये दिवसाढवळ्या असा प्रकार घडतो याचा सरळ अर्थ असा की या प्रक्रियेवर कुणाचंही लक्ष, वचक किंवा नियंत्रण नाही. याआधी किती होतं हा जसा अनुत्तरीत प्रश्न आहे, तसंच यानंतरही किती राहील, हा देखील अनुत्तरीत प्रश्नच राहणार आहे. कारण संबंधित पीडित तरूणीने हिंमत करून या प्रकाराबाबत तक्रार केली, म्हणून किमान हा प्रकार उघडकीस आला. उघडकीस न आलेले देखील अनेक प्रकार असण्याची दाट शक्यता आहे.



हा प्रकार काही फक्त बडनेरापुरताच मर्यादित नाही. त्यामुळे तो आत्ताच घडला किंवा त्यामुळे मोठा गोंधळ झाला असंही काही नाही. तपासणीच नाही, तर चक्क आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित महिलांवर देखील बलात्काराच्या निर्लज्ज घटना घडल्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रातही घडलेत, भारतातही घडलेत आणि जगभरात घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका महिलेवर तिथेच दाखल झालेल्या दुसऱ्या पुरुषाने बलात्कार केला. आपण डॉक्टर असल्याचं सांगून अंग दुखत असल्याच्या तक्रारीवर या विकृताने महिलेवर मसाजच्या नावाखाली बलात्कार केला. याचा अर्थ या काळात रुग्णालय प्रशासन, आसपासचे रुग्ण, रुग्णालय कर्मचारी या कुणालाही या घटनेची साधी कुणकुण देखील लागली नाही इतक्या शिताफीने तो विकृत हे कृत्य करू शकला. प्रशासकीय हलगर्जीपणाचा हा भीषण नमुना ठरावा. याच महिन्याच्या २४ तारखेला दिल्लीच्या कोविड केअर सेंटरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सेंटरच्या बाथरूममध्ये एका नराधम तरूणाने अत्याचार केले. विकृतीचा कळस इतका की त्या अत्याचाराचा त्यानं व्हिडिओ देखील बनवला. कोरोना चाचणी करण्याच्या नावाखाली राजस्थानच्या रतनगड परिसरात दोघा नराधमांनी एका ३६ वर्षीय महिलेवर रुग्णालयाच्या मागच्या बाजूला नेऊन बलात्कार केला. बिहारच्या गयामध्ये तर आयसोलेशनमध्ये असलेल्या गर्भवती महिलेवर रुग्णालयातल्याच एका कर्मचाऱ्यानं बलात्कार केला. ही यादी अशी वाढतच जाते.

कोरोनासारख्या गंभीर साथीच्या आजाराच्या काळात अशा प्रकारे महिलांमध्ये रुग्णालय, आयसोलेशन सेंटर किंवा कोविड सेंटर्समध्ये जाण्याबद्दल भिती निर्माण होणं हे एकूणच महिलांच्या सुरक्षेसाठीही आणि त्यांच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. कोरोनाच्या नावाखाली या महिलांची फसवणूक होणं आणि त्यांच्यावर अत्याचार होणं ही बाब जशी गंभीर आहे, तशीच या महिला या अशा प्रकारांबाबत सतर्क नसणं ही देखील गंभीर बाब आहे. आणि याला कारण कोरोनाच्या आजाराचं स्वरूप हेच आहे. आपल्याला ज्या आजाराबद्दल पुरेशी माहिती नाही, ज्या आजारावर आजतागायत औषध किंवा उपचार सापडलेला नाही आणि जो आजार वाढला तर जीवघेणा ठरतोय, जगभरात लाखो लोकं अशा आजारामुळे मरण पावत आहेत, अशा आजाराच्या विषाणूची आपल्याला लागण झाली आहे किंवा होऊ शकते म्हटल्यावर आधीच या महिला घाबरलेल्या असतात. त्यात डॉक्टर किंवा रुग्णालयातील व्यक्तीच त्यासंदर्भात काही सांगत असेल किंवा उपचारांच्या नावाखाली काही करत असेल, तर त्यावर महिलांचा विश्वास बसणं ही साहजिक बाब आहे. त्यामुळे इथे सरकार किंवा प्रशासन या बाबींवर पुरेशी जनजागृती करण्यात अपयशी ठरल्याचंच यातून पुढे येत आहे. स्वॅब फक्त नाकातून किंवा घशातूनच घेतला जातो, इतकी मूलभूत बाब देखील सगळ्यांपर्यंत अद्याप पोहोचू शकलेली नाही हे वास्तव बडनेराच्या घटनेनं समोर आणलं आहेच.



खरंतर दिल्लीमध्ये घडलेल्या घटना, राजस्थानमध्ये घडलेल्या घटना, महाराष्ट्रात पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये घडलेली घटना किंवा अगदी परवाची बडनेराची घटना, या घटना घडल्यानंतर इतर कोणत्याही बलात्काराच्या किंवा महिला अत्याचाराच्या घटनांप्रमाणेच काही दिवस चर्चा होऊन ते विषय मागे पडले. या घटनांमधून महिला सुरक्षा आणि महिलांच्या डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी किंवा आरोग्य यंत्रणेवरच्याच विश्वासाला तडा गेला आहे. कोरोनाच्या काळात तर रोज नव्याने वाढलेले रुग्ण आणि कोरोनावरच्या लसींच्या शोधाचे किंवा संशोधनातल्या प्रगतीचे मुद्दे रोज नव्याने चघळले जात असताना कोरोनाच्या पडद्याआड महिलांवर झालेल्या (किंवा भयंकर अंदाजाने होत असलेल्या) घटनांविषयी ठोस पाऊल उचलणं आणि त्या घडू नयेत म्हणून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं नितांत आवश्यक झालं आहे. कारण कोरोनाचा विषाणू हे फक्त या वर्षीचं संकट आहे. त्यावर प्रतिबंधात्कम लसीची आपण सगळेच वाट पाहात असताना ती नजीकच्या भविष्यकाळात येईलही. पण पुरूषी विकृतीचा हा विषाणू आज समाजातल्या अनेक पुरुषांमध्ये भिनलाय, त्यावर प्रतिबंधात्मक उपचार गेल्या शेकडो वर्षांमध्ये सापडलेले नाहीत. कोरोनावर उपचार शोधणं ही जशी संशोधकांची आणि वैज्ञानिकांची जबाबदारी आहे, तशी या विकृतीच्या विषाणूवर उपचार शोधणं ही समस्त मानवजातीची जबाबदारी आहे!

Friday, July 17, 2020

भूकबळी की कोरोनाबळी! चॉईस इज युअर्स!

Maharashtra lockdown Mumbai lockdown

संयुक्त राष्ट्र अर्थात United Nations चा The State of Food Security and Nutrition in the World 2020 हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जगभरात मोठ्या प्रमाणावर भूकबळी आणि गरिबी वाढू लागली आहे. त्यामुळे २०२० या एका वर्षातच जगभरात ८.३ ते १३.२ कोटी लोकं अल्पपोषित किंवा कुपोषित राहण्याचा अंदाज आहे. हे वाचायला फक्त आकडे असले, तरी याचा अर्थ इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढणार आहे. कोरोनामुळे जगभरात झालेल्या आणि होणाऱ्या मृत्यूंपेक्षा हा आकडा १०० हून जास्त पटींना मोठा आहे! त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घरात बसून राहणं आणि उद्योगधंदे बंद ठेवणं यामुळे किती नुकसान होऊ शकतं, याचं भीषण वास्तवच या आकडेवारीनं समोर आणलं आहे. या परिस्थितीत बाहेर पडलो तर कोरोनामुळे कदाचित बाधित होऊ, पण घरात बसून राहिलो तर उपासमारीने हमखास गाळात जाऊ, या निर्णयाप्रत लोकं आले आहेत.

'आपली तयारी आहे कोरोनासोबत जगण्याची, पण कोरोनाची तयारी आहे का आपल्याला त्याच्यासोबत जगू द्यायची?' खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हे वाक्य! कोरोनाच्या काळात त्यांनी लोकांना उद्देशून जी काही फेसबुक लाईव्हं केली, त्यातल्या एका लाईव्हमधला हा सर्वात चर्चेत राहिलेला डायलॉग! चर्चेत यासाठी कारण या डायलॉगवरून प्रचंड मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. कोरोनाशी संबंधित इतर सर्व मुद्द्यांवर ज्या प्रमाणे विनोद झाले, त्याचप्रमाणे याही गोष्टीवर विनोद झाले. गेल्या ६ महिन्यांपासून कोरोना देशात ठाण मांडून बसला आहे. जसे कोणत्याही नव्या सरकारसाठी पहिले ६ महिने हनिमून पिरियड म्हटले जातात, तसेच पहिले तीन महिने जणूकाही कोरोनासाठीही आणि लोकांसाठीही हनिमून पिरियडसारखेच गेले. चेष्टा, मस्करी, विनोद, टाईमपास, लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होमची मजा, वेगवेगळ्या रेसिपी, नवनवे प्रयोग, व्हिडिओ कॉलिंगला आलेला ऊत, झूमवरचे बक्कळ इंटरव्यू-मीटिंगा असं सगळंकाही या पहिल्या तीन महिन्यात अगदी धमाल आणि नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी वेगळं म्हणून लोकांनी एन्जॉय देखील केलं. पण पहिल्या तीन महिन्यातला हनिमून आता ओसरला असून खरा भीषण कोरोना समोर आला आहे. पण आपल्याला त्याच्यासोबत जगू द्यायची तयारी नसलेल्या कोरोनाची बखोटी धरून त्याच्या मानगुटावर बसून, प्रसंगी गळ्यात गळे घालून लोकांनी त्याला अंगवळणी पाडून घेतला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नाका-तोंडाला हात लावायचा नाही इथपर्यंत ठीक होतं. पण सकाळ-दुपार-रात्र असं दिवसातून तीन वेळ हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी लोकांपुढे कोरोनाला शिंगावर घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही. आणि त्यांनी ते घेतलंही!

कोरोनाचं मोठं विलक्षण चित्र सध्या देशात आणि महाराष्ट्रात दिसतंय. जेव्हा इथे दिवसाला तीन अंकी रुग्ण सापडायचे, तेव्हा सगळी जनता घरात कुलूपबंद करून ठेवल्यासारखी मारून मुटकून कोंडून ठेवली. आता दिवसाला चार अंकी रुग्ण सापडतायत आणि तीन अंकी रुग्णांचा मृत्यू देखील होतोय, पण आता मात्र अनलॉक आणि मिशन बिगीन अगेन म्हणत गाड्या, बायका, माणसं, पोरं-टोरं, विमान असं सगळं बाहेर पडलंय. नव्हे, सरकारला ते पाडावं लागलंय. सुरुवातीच्या तीन महिन्यांत लोकांना घरात बसा म्हणून विनवावं लागत होतं, ते शारिरीक आरोग्यासाठी..आता लोकांना आपली काळजी घेऊन घराबाहेर पडण्याचं आवाहन करावं लागतंय, ते आर्थिक आरोग्यासाठी. अनलॉक १.० किंवा मिशन बिगीन अगेनची ऑफिशियल घोषणा होण्याआधीच जनमानसाचा निर्धार झाला होता. त्यांच्यासाठी मिशन बिगीन अगेन केव्हाच सुरू झालं होतं. त्यामुळे जिवावर उदार होऊन त्यांनी आपापल्या घरांचे उंबरे ओलांडले होते.

lockdown

आज बाहेर फिरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तुम्ही बाहेर का फिरत आहात, तर त्याच्याकडून काही ठराविक आणि कॉमन अशी उत्तरं मिळतील. पहिलं म्हणजे 'काही पर्याय आहे का?', दुसरं 'घरात किती दिवस बसून राहणार? शेवटी कुठेतरी सुरु करावंच लागेल ना?' आणि आताशा सुरू झालेलं तिसरं उत्तर म्हणजे 'आता बाहेर पडावंच लागेल, बघू काय होतंय ते'! लोकांनी कोरोनाला आता शिंगावर घेतलंय. तोंडाला मास्क लावून का होईना, दिवसातून शंभर वेळा हातावर सॅनिटायझर लावून का होईना, घरात आल्यानंतर वस्तूंना सॅनिटायझरने आणि स्वत:ला गरम पाण्याने आंघोळीचे सोपस्कार पार पाडून का होईना पण लोकांनी आता कोरोनाचं मानगुट पकडून कामधंदा सुरू केला आहे. शेवटी माणूस कितीही पैसेवाला असला किंवा कितीही गरीब असला, तरी त्यानं कामकाज सुरू करणं हे इतरांसाठीही आवश्यक असतंच. आपल्या आर्थिक संरचनेत सगळेच इतके परस्परावलंबी झालेत की यातला एक कुठला घटक गायब झाला, की त्याचा परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर व्हायला लागतो. श्रीमंत माणूस सगळं बंद करून घरात बसला की त्याच्या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांवर संकट येतं. आणि कामगार वर्ग घरी बसला की त्यांच्यावर अवलंबून असलेला मालक वर्ग संकटात येतो. त्यामुळे या प्रत्येक घटकाला घराबाहेर पडणं त्यांच्या स्वत:साठीही आणि व्यापक आर्थिक-सामाजिक हितासाठीही गरजेचं होतं.

हल्ली कोरोनाची लस असं कुठेही ऐकलं, वाचलं किंवा पाहिलं की झाडून सगळ्यांचे डोळे, कान (आणि काहींचं नाकही! बातमीचा वास असणारे!) लगेच टवकारले जातात. सगळ्यांनाच त्याची प्रतिक्षा आहे. पण जगभरातल्या ७० हून जास्त संस्था कोरोनाच्या लसीचा मागोवा घेत असताना कुणालाही लस यशस्वीरीत्या बनवण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण करता आलेली नाही. अनेक तज्ज्ञांनी असं स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की २०२१च्या आधी कोरोनाची लस येण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे अनेकांनी २०२० हे वर्ष आयुष्यात ब्लॅक इयर म्हणून जाहीर देखील करून टाकलं आहे. पण म्हणून कोरोनाच्या लसीच्या प्रतिक्षेत घरात बसून राहणं परवडणारं नाही. त्यामुळे लस येईल तेव्हा येईल, पण आपण कामाला लागा, होईल ते होईल, अशा मानसिक स्थितीपर्यंत सर्व येऊन पोहोचले आहेत.

Moderna COVID-19 vaccine

लोकांचे जीव घेणाऱ्या आजारावर संशोधन असलेल्या लसीची प्रतिक्षा जरी सगळ्यांना असली, तरी त्यासाठी कुणी हवालदील झाल्याचं चित्र अजून तरी दिसत नाहीये. लोकांनी आता परिस्थिती स्वीकारली आहे. जे आहे ते असं आहे आणि यातूनच मार्ग काढायचा आहे याची व्यापक जाणीव कोणत्याही सामाजिक जनजागृतीशिवाय किंवा कुणीही सांगितल्याविना आपोआप उत्स्फूर्तपणे आली आहे. त्या अर्थाने गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, रोजंदारीवरचे, एसी ऑफिसातले, सरकारी नोकरीतले, खासगी कंपन्यांत घाण्याला जुंपलेले असे सगळेच कोरोनानं एकाच रांगेत आणून बसवले आहेत. सगळ्यांना लागण होण्याची सारखीच शक्यता. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधले बेड्स आता सरकारी ताब्यात असल्यामुळे सगळ्यांवर उपचार होण्याचीही सारखीच शक्यता (खासगी रुग्णालयांमधले लाखोंच्या बिलांचे २० टक्के बेड्स वगळता!). आणि मृत्यूचं म्हणाल तर ते पूर्णपणे आपल्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून! ज्या देशातली लस यशस्वी होईल, त्या देशातल्या नागरिकांना प्राधान्याने ती मिळणार. त्या गणितानुसार २०२१च्या सुरुवातीला जरी लस आली, तरी ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला आख्खं २०२१ हे वर्ष जायचीच शक्यता जास्त. त्यामुळे जी गोष्ट पुढच्या वर्षभरात आपल्या आसपासही फिरकण्याची शक्यता नाही, अशा गोष्टीच्या भरवशावर आपलं सगळंच सोडून देणं म्हणजे आपणच आपला नाश करून घेण्यासारखं आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या आधी उपासमारीनेच जीव जाण्याचा धोका जास्त आहे!

शेवटी आपण कोरोनासोबत जगायला तयार झालो काय किंवा कोरोना आपल्यासोबत जगायला तयार झाला काय, यात फायदा किंवा नुकसान कोरोनाचं काहीच होणार नाही. जे होणार ते आपलं होणार! घराबाहेर पडलेली सगळीच लोकं काही नियम मोडायला किंवा घरात कंटाळा आला म्हणून किंवा फिरायला म्हणून बाहेर पडलेली नाहीत. काही अपवाद असतीलही. पण व्यापक अर्थाने विचार केला, तर यातल्या बहुतेकांना हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. जिथे ८-१० लोकांचा मृत्यू झाला तरी गहजब होऊन वृत्त-प्रसारमाध्यमांमध्ये मोठमोठाले मथळे व्हायचे, तिथे दिवसाला शेकडो लोकांचे मृत्यू होऊनही फक्त वाढलेल्या 'काऊंट'मध्ये त्याची गणना होतेय. मात्र, अशा परिस्थितीतही जेव्हा कुणी काम-धंदा सुरू करतो, तेव्हा या सर्व भितीच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी घडू लागल्या आहेत हे समजून जावं!

संयुक्त राष्ट्राचा सविस्तर अहवाल - https://sustainabledevelopment.un.org/index.php?page=view&type=20000&nr=6909&menu=2993

Saturday, June 20, 2020

मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी!



एक गाव...मध्यरात्री सगळे डाराडूर असताना अचानक किचकिचाट, गडबड, गोंधळ झाला आणि खाडकन् सगळ्यांची झोप उडाली..काही डोळे चोळत उठले, तर काहींची थोबाडं सुजली म्हणून उठले...घराघरातून सगळेच आवाजाच्या दिशेनं धावत सुटले..गर्दीत एकटे पडू नये म्हणून गर्दीचा भाग होऊ लागले...स्वत:ही निरनिराळे आवाज काढून बोमट्या मारू लागले...घटनास्थळी पोहोचले तेव्हा एका घरात दरोडा पडल्याचं दिसलं..सगळं लुटल्यामुळे घर आता मोकळं झालं होतं...गर्दीत त्या घरावरून रोज जाणाऱ्यांसोबतच लांबून कधीतरी कुणी आपल्या घराच्या गच्चीवरून नजर टाकताना त्याही घरावर चुकून नजर गेलेली मंडळीही होती...त्या घरात जाऊन चहापानी करून आलेली जशी होती, तशीच त्या घराच्या पाण्यावरही वाकडं तोंड करून बहिष्कार घातलेली होती...भकभकून उजाडल्यानंतर मोठ्या सायबानं जाहीर केलं, दरोडा पडलेल्या घराला नुकसानभरपाई मिळणार! झालं...आख्ख्या गावात घराघरात पडलेल्या दरोड्याच्या सुरस कथा सुरू झाल्या, ऐकवल्या आणि चघळल्या जाऊ लागल्या... हळूहळू गावातल्या मंडळींची त्यांच्या कथांमधून त्यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यासाठी सायबाच्या कचेरीत रीघ लागली... काही हात धुवायला, तर काही हात शेकायला... आता सायबाला प्रश्न पडला की कुठल्या गावकऱ्यावर विश्वास ठेवावा आणि कुठल्याची कथा कल्पना म्हणून सोडून द्यावी! बॉलिवुडची गत सध्या या गावासारखी झाली आहे!

आठवड्याभरापूर्वीपर्यंत हे बॉलिवुड नावाचं गाव एकदम सुशेगात नांदत होतं. सर्व काही स्थिरस्थावर ज्याच्या त्याच्या ठिकाणी सुखेनैव होतं. हसणाऱ्या पार्ट्या, भिडणारे खांदे, साजरे होणारे १००-२००-३०० कोटींचे पल्ले, गुपचुप चघळले जाणारे गॉसिप, जाहीरपणे दिसणारं प्रेम, डीजे बुलाव गाना बजाव धमाका असं सगळं सगळं होतं. बाहेरून बघणाऱ्यांना सगळं कसं छान छकोर शब्दश: चंदेरी वाटत होतं. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये या चंदेरी सृष्टीतले काही तारे निखळले, तरी ती दुनिया तिचा साज लेवूनच उभी होती. पण सुशांत सिंह राजपूत नावाचं एक वादळ या गावात घोंगावलं आणि तो साज तिची लाज चव्हाट्यावर आणेपर्यंत टराटरा फाटला. याआधी देखील इंडस्ट्रीमध्ये सिनेतारक-तारका किंवा पडद्यामागच्या हातांनी आत्महत्येचं पाऊल उचललं नव्हतं असं नाही. जसं वादळ जिया खानच्या वेळी उठलं, तसंच वादळ प्रत्युषा बॅनर्जीच्या वेळीही आलं, तसं ते कुशल पंजाबीच्या वेळीही आलं. पण यावेळच्या वादळात या दुनियेतल्याच गावकऱ्यांनी तिचा साज फाडून तिचं दुसरं रूप लोकांसमोर आणायला सुरुवात केली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडची ही काळी किनार अधिक काळी कुळकुळीत आणि ठळकपणे समोर यायला लागली.

खरंतर सुशांतसिंह राजपूरच्या आत्महत्येमागचं वास्तव अजूनही समोर यायचं आहे. पोलिसांचा तपास पूर्ण व्हायचा आहे. खरंच सुशांतवर इंडस्ट्रीचं प्रेशर होतं, की त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या तणावातून त्यानं आत्महत्या केली की अगदी टोकाचा तर्क म्हणजे त्याची कुणी हत्या केली आणि ती आत्महत्या भासवली? तर्क-वितर्क असंख्य असू शकतील. ना सुसाईड नोट ना इतर कुठली स्पष्ट कारणं असल्यामुळे पोलिसांनाही अजून या तपासाची नेमकी दिशा समजलेली नाही. पण या घटनेमुळे बॉलिवुड मात्र वेगळ्याच दिशेने वाहू लागलं आहे. ज्या बॉलिवुडमधून आजपर्यंत चित्रपटांनी कमावलेला गल्ला, उभारलेले मोठमोठाले सेट, शहेनशाह-चॉकलेट बॉय-झिरो फिगर-बोल्ड अॅण्ड हॉट असल्याच गप्पा ऐकायला मिळायच्या, तिथे आज एक नवीन मी टू सुरू झालं आहे!

पोलिसांचा तपास आणि त्याचा निष्कर्ष येण्याआधीच बॉलिवुडमधल्या सेलिब्रिटी मंडळींनी सो कॉल्ड अर्थात तथाकथित बिग शॉट्सवर निशाणा साधून ही मंडळी कसं इतर छोट्या माशांना खाऊन या समुद्रातली बडी मछली झाली आहेत, यावर सोशल मीडियावर लंब्याचौड्या पोश्टी आणि व्हिडिओबाजी करायला सुरुवात केली. कुणी काही अज्ञात वर्षांपूर्वी त्यांच्या झालेल्या बुलिंगबद्दल बोलायला लागलं, तर कुणी आपल्या संपलेल्या करिअरबद्दल आकांडतांडव करायला लागलं. कुणाला आपल्या वेळेआधीच संपलेल्या करिअरची जाणीव झाली तर कुणाला गायन क्षेत्रात होणाऱ्या भावी आत्महत्यांचा आत्ताच साक्षात्कार झाला! थोबाड फुटल्यासारखा गाव जागा झाला आणि आवाजाच्या दिशेनं ओरडत सुटला!

अनुराग कश्यप या प्रथितयश बॉलिवुड सेलिब्रिटीचा भाऊ अभिनव कश्यपने त्याचं करिअर सलमान खान अॅण्ड फॅमिलीने संपवल्याचा दावा केला. अभिनेत्री कंगणा राणावतने पुन्हा एकदा तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. अभिनेत्री आयेशा टाकियाने तिला सामना करावा लागलेल्या बुलिंगबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठाली पोस्ट टाकली. साहिल खान नावाच्या एका अभिनेत्याने आपलं अभिनेता म्हणून करिअर कसं संपवलं गेलं, याबद्दल अचानक भरभरून बोलायला सुरुवात केली. बिग बॉस नावाच्या एका रिअॅलिटी शोच्या १३व्या सीजनमध्ये दिसलेला अभिनेता अरहान खान डिप्रेशनमध्ये असल्याचं त्याच्या प्रवक्त्याने जाहीर केलं. गायक सोनू निगमने तर या सर्वावर कडी करत भविष्यात संगीत विश्वातूनही आत्महत्यांच्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील, असं जाहीरही करून टाकलं. गाव रांगेत लागला!

गेल्या वर्षी अशीच एक मीटू चळवळीची लाट उठली होती. त्याची सुरुवात जरी परदेशातून झाली असली, तरी बॉलिवुडमध्ये त्याची सुरुवात झाली ती एकेकाळची बॉलिवुड अभिनेत्री आणि सध्या परदेशात वास्तव्यास असलेली तनुश्री दत्ता हिच्यापासून. तिने थेट नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला. प्रकरण प्रचंड गाजलं. त्यामागून अनेक अभिनेत्रींनी असे मीटू हॅशटॅगवर आपले अनुभव सांगितले. त्यातून काहींची हातातली काही कामं, काही शो गेले. पण याऊपर त्याचं काही झालंय असं अजिबात दिसलं नाही. सर्वात विशेष म्हणजे, ज्या तनुश्री दत्ताच्या आरोपांवरून याला बॉलिवुडमध्ये सुरुवात झाली होती, त्या प्रकरणात अद्याप कळलं नाही की नक्की खरं कोण बोलत होतं? ते वादळ जसं उठलं, तसंच शांतही झालं. इंडस्ट्री पुन्हा सुखेनैव सुरू झाली! त्या त्या कलाकार, गायक, संगीतकार, अभिनेत्यांचं आयुष्य जस्ट फॉर चेंज इतकं हललं आणि पुन्हा स्थिरस्थावर झालं. सध्या बॉलिवुडमध्ये हेच मीटू नव्या प्रकारात अवतरलं आहे. पण त्याचा परिणाम तोच होईल की अजून काही?

बॉलिवूडमधल्या खूप मोठमोठ्या नावांवर सध्या आरोप होत आहेत. या नावांची जी काही लार्जर दॅन लाईफ प्रतिमा लोकांच्या, त्यांच्या चाहत्यांच्या, बॉलिवुडमधल्या सहकलाकारांच्या किंवा इतर मंडळींच्या मनात होती, त्या प्रतिमेला आता मोठमोठाले तडे जाऊ लागले आहेत. या आरोपांमधून बॉलिवुड नावाच्या या चंदेरी गावाची अजून एक काळी बाजू समोर येऊ लागली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात नक्की काय झालंय, हे बाहेर येईल तेव्हा येईल, किंवा कदाचित ते कधीच येणार देखील नाही. पण त्याच्या मागून बॉलिवुडचा हा अंधारातला चेहरा आता उजेडात येऊ लागला आहे. आणि तो चेहरा जर आरोप करणाऱ्यांच्या दाव्यांप्रमाणेच भीषण आणि काळाकभिन्न असल्याचं सिद्ध झालं, तर मात्र त्याची मोठी किंमत या नावांना चुकवावी लागेल. पण आजवरच्या अशा अनेक प्रकरणांमध्ये ती चुकवावी लागणार नाही, याची पुरेपूर काळजी ही मंडळी घेत आलेली आहेत.

खान, भट्ट, कपूर आणि या सर्व बॉलिवुडमधल्या ऐरावती घराण्यांसोबत फिल्म्स करणारा करण जोहर हे सध्या टार्गेटवर आहेत. जणूकाही ही मंडळी बॉलिवुडमधली खरी व्हीलन असल्याचाच भास आता होऊ लागला आहे. जो उठतोय तो या सगळ्यांना टार्गेट करून आपल्यावर कसा अन्याय झाला होता, याचे दाव्यांमागून दावे करतोय. कदाचित येत्या काही काळात या सर्व व्हीलनच्या रांगेत अजून काही नावं समाविष्ट होतील. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे. यातलं कुणीही ते करत असलेल्या आरोपांच्या पुराव्यादाखल काहीही सादर करत नाहीयेत किंवा करू शकत नाहीयेत. त्यामुळे आता लोकांसमोर प्रश्न पडला आहे की कुठल्या आरोपांवर विश्वास ठेवावा आणि कुठले फक्त आपली भडास काढण्याची संधी म्हणून केलेले काल्पनिक दावे म्हणून सोडून द्यावेत? गावकरी प्रचंड आकांडतांडव करतायत आणि सायबाकडे हा सगळा तमाशा फक्त बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही!

Thursday, March 14, 2019

पान...



अजून एक पान पलटलं...
त्याच्यावरच्या शाईसह...
बऱ्या-वाईट बोलांसह..
आखीव-रेखीव आकड्यांसह..
परिच्छेद आणि वाक्यांसह...
काना, मात्रा, वेलांट्यांसह...
अर्थ आणि अनर्थांसह...
शब्द आणि शब्दार्थांसह...
कुठे आकड्यांचा काटेकोरपणा...
तर कुठे अक्षरांचा वळणदारपणा
कुठे मात्र्यांचा डोईजडपणा..
तर कुठे उकारांची नतमस्तकता..
कुठे जोडाक्षरांचा मनमिळाऊपणा..
तर कुठे पोटफोड्यांचा तुटकपणा...
काळाची धूळ अंगावर घेऊन...
चिक्कार ठिकाणी दुमडलं जाऊन
कोपरे फाटून किंवा झडून...
एक दिवस पलटलोच जाणार,
हे नशीब माहीत असून सुद्धा...
मोठ्या हिंमतीनं पुस्तकाला
घट्ट चिकटून राहिलेलं...
आणि कधीही पुसले जाणार नाहीत,
असे शब्द अंगावर झेलून...
अजून एक पान पलटलं...
मागच्या पानाची सोबत करायला...
आणि पुढच्याची वाट पाहायला...

- प्रविण वडनेरे (१ जानेवारी २०१८)