Monday, February 1, 2021

चिंतन नक्की कुणी करायचंय?



गेल्या वर्षभरात किमान डझनभर वेळा भाजपकडून राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या वल्गना किंवा घोषणा किंवा इशारे देण्यात आले. त्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून अगदी ज्यांच्याकडे कोणत्याही सदनाची उमेदवारी नाही असे सदैव शिवसेनेवर सदैव टीकाच करत राहणारे किरीट सोमय्या यांच्यापर्यंत झाडून सगळ्या भाजप नेत्यांचा समावेश होता. भाजपचे काही केंद्रीय मंत्रीदेखील यामध्ये मागे राहिले नाही. त्यामुळे राज्यातल्या जनतेच्या मनातदेखील महाविकास आघाडीचं सरकार कधीही पडू शकतं, अशीच धारणा निर्माण झाली होती. भाजपच्या काही नेत्यांना तर सत्तेत बसून मंत्रीपदाची देखील स्वप्नं पडू लागली होती. मात्र, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे निकाल मात्र या धारणांना जबरदस्त धक्का देणार्‍या ठरल्या आहेत. हा धक्का फक्त मतदारांसाठी, भाजपसाठी किंवा शिवसेनेसाठीच नाही तर सत्तेतल्या सर्वच पक्षांसाठी आहे. त्यामुळे सगळ्यांनीच या निकालांचे अन्वयार्थ लावून त्यावरून आत्मचिंतन करणं गरचेचं आहे. अर्थात, कुणासाठी ते इशारा देणारं ठरेल आणि कुणासाठी ते आत्मविश्वास वाढवणारं ठरेल, हे ज्या-त्या पक्षाच्या धोरणांवर अवलंबून असणार आहे.

राज्यात धुळे नंदुरबार या विधान परिषदेच्या जागेची पोटनिवडणूक, 3 पदवीधर मतदारसंघ आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला जबरदस्त झटका बसला असून त्यांना एकमेव जागा जिंकता आलेली आहे. मात्र, तिही काँग्रेसमधून आयात करण्यात आलेल्या उमेदवाराच्या जोरावर भाजपनं जिंकलेली आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून लढवलेल्या या निवडणुकीत भाजपला अक्षरश: धोबीपछाड दिली आहे. त्यामुळे साहजिकच सत्तेतल्या तीनही पक्षांसाठी ही निवडणूक आत्मविश्वास वाढवणारी ठरली, तर विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, त्याचं सविस्तर निरीक्षण आणि अंतरप्रवाह पाहिले जाणं आवश्यक आहे. त्या त्या पक्षांकडून ते काम आता होईलच.

या सगळ्याला सुरुवात झाली धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीपासून. गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसच्या तिकिटावर हा मतदारसंघ बांधणार्‍या अमरिश पटेल यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सुरू असलेल्या मेगाभरतीमध्ये भाजपच्या हाती लागलेला उत्तर महाराष्ट्रातला हा मोठा नेता. धुळे-नंदुरबारमधून सलग 4 वेळा विधानसभा आमदार आणि सलग दोन वेळा विधान परिषद आमदार राहिलेले अमरिश पटेल याही वेळी परिषदेवर निवडून जातील, हे निश्चित मानलं जात होतं. निकाल देखील तसाच लागला. मात्र, कागदोपत्री जरी ही जागा भाजपने जिंकली असली, तरी हा खरा विजय अमरिश पटेल यांचाच मानला गेला. त्यामुळे धुळे-नंदुरबारमध्ये भाजपच्या हाती फारसं काही लागलं नाही. मात्र, तरीदेखील इतर 5 जागांचे निकाल हाती येण्याआधीच भाजपनं ‘ही तर विजयाची शुभ सुरुवात’, अशा थाटात या निकालाचं स्वागत केलं. पण हा भाजपसाठी उतावीळपणाच ठरला!

शुक्रवारी सकाळपासून जसजसे इतर जागांचे निकाल हाती येऊ लागले, तसतसा भाजपच्या दाव्यांमधला आणि त्यांच्या फसव्या आत्मविश्वासामधला फोलपणा उघडा पडू लागला. यात सगळ्यात मोठा धक्का भाजपसाठी ठरला तो नागपूरचा. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय (आणि त्यातही मोठ्या संख्येने संघाचे तरूण कार्यकर्ते!) असं सगळं असल्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून नागपूर हा भाजपचा गड राहिला आहे. इथल्या पदवीधर मतदारसंघावर भाजपचा अघोषित हक्कच होता असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. पण फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या संदीप जोशींनाही आयत्या मतदारसंघावर ताव मारता आला नाही. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी तब्बल 18 हजार 710 मतांनी त्यांचा पराभव केला.

भाजपसाठी दुसरा धक्का ठरला तो पुणे पदवीधर मतदारसंघाचा. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि खुद्द विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला झालेला हा मतदारसंघ गृहीत धरला गेला. पण इथे महाविकास आघाडीतला दुसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरूण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुखांना 50 हजारांहून जास्त मतांनी पराभूत केलं. पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसच्या जयंत आसगावकरांनी विजय मिळवला. इथे तर भाजपचे जितेंद्र पवार थेट तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. औरंगाबादमध्ये देखील राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. तिथे सलग दोन टर्म पदवीधर आमदार राहिलेले सतीश चव्हाण विजयाची हॅट्ट्रिक करतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या भाजपच्या शिरीष बोराळकरांना तब्बल 57 हजारांहून जास्त मतांनी पराभव पत्करावा लागेल, अशी अपेक्षा खुद्द राष्ट्रवादीलादेखील नसावी! अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विधान परिषदेवर शिक्षक आमदार म्हणून निवडून गेले आहेत.

खरंतर या निवडणुकांच्या आधी ज्या पद्धतीने भाजपकडून पाचही मतदारसंघ प्रतिष्ठेचे करण्यात आले होते, ते पाहाता निकाल भाजपच्या बाजूने किमान 5-1 असा लागेल, असा राजकीय धुरिणांचा होरा होता. खुद्द महाविकास आघाडीमध्ये देखील इतका थेट आणि सरळ विजय मिळेल, अशा अंदाज नसावा. या निवडणुकांनंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेने ते करण्याची गरज जरी असली, तर त्याहून जास्त गरज ती भाजपला आहे हे मात्र ते सांगायचं विसरले किंवा त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं. कारण राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आणल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीसांना सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे राज्यात तीन पक्षांचं सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. दुखापतीनंतर पुन्हा खेळायला आलेल्या फलंदाजाला जशी चांगल्या खेळीने सुरुवात करण्याची आशा आणि अपेक्षा असते, तशीच ती भाजपला देखील होती. पण त्या प्रमाणात सराव करण्यास मात्र भाजप सपशेल अपयशी ठरली, हे खुद्द त्यांच्याच पक्षाच्या दिग्गजांनी मान्य केलं हे बरंच झालं. या निवडणुकीत विरोधकांचा अंदाज घेणे आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करणे यामध्ये भाजप कमी पडल्याची कबुलीच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांसाठी या निवडणुकीतून दुहेरी धक्का बसला. आधी 105 आमदार असूनही सत्ता स्थापन करण्यात अपयश आलेलं असताना आता बालेकिल्ला आणि स्वत:चा हक्काचा मतदारसंघ असलेल्या नागपूर गडदेखील गमावल्यामुळे फडणवीसांना आता अधिक तीव्र पक्षांतर्गत विरोधक आणि नाराजीचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या आणि राज्यातले भाजपचे दुसर्‍या क्रमांकाचे महत्त्वाचे नेते असलेल्या चंद्रकांत पाटील यांनादेखील त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे मतदारसंघाची जागा राखता आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीनं या विजयातून महाराष्ट्र भाजपच्या दोन्ही मर्मस्थळांवर आघात केल्याचं म्हटलं तर वावगं ठरू नये!

दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही विन-विन परिस्थिती ठरली आहे. राज्याच्या सत्तेत दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर असूनही त्यांच्या उमेदवारांनी प्रमुख विरोधक असलेल्या भाजपला धूळ चारली. मात्र, या निकालांमधून सत्ताधार्‍यांना देखील हे पक्क कळून चुकलं आहे की भाजपसारख्या कडव्या आणि ताकदवान विरोधी पक्षासमोर तिघं एकत्र राहिले, तरच पाडाव शक्य होऊ शकतो. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं उघड आव्हान केलं. अर्थात, आघाडी म्हणूनच तिन्ही पक्ष निवडणूक लढवत असल्यामुळे या आव्हानाला तसा काही अर्थ उरला नसला, तरी त्यांनी देखील या निकालांचा अर्थच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सूचित केलाय!

या फक्त राज्यातल्या 5 मतदारसंघातल्या आणि त्याही पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी निवडून दिलेल्या जागा जरी असल्या, तरी राज्यातला सुशिक्षित तरूण मतदार नक्की कोणत्या राजकीय वैचारिक घुसळणीतून सध्या जातोय, त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण नक्कीच ठरावं. कोरोना काळात भाजपनं सत्ताधार्‍यांविरोधात उडवलेले टीकेचे बार राज्यातल्या सुशिक्षित मतदारांनी फुसके ठरवले आहेत. त्यामुळे फक्त राजकीय घोडेबाजाराच्या जीवावर सत्तेचे फासे फिरवून ‘आम्ही पुन्हा येऊ’च्या वल्गना करणार्‍या विरोधकांना जनतेमधला, युवा वर्गातला आपला जम ढळू शकतो, याची भीती नक्कीच निर्माण झाली आहे. पण त्यासोबतच, भाजपचा जम उखडून पुन्हा कमबॅक करण्याची संधी महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांसमोर आता दिसू लागली आहे. आता सत्ताधारी तिचं संधी समजून सोनं करणार की फक्त लक बाय चान्स समजून पुढे निघणार, हे मात्र त्या त्या पक्षाच्या धोरणावर अवलंबून असेल!

हा कोरोना किती लाच घेतो हो?

चहाच्या ठेल्याच्या उद्घाटनासाठी देखील माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जातात!

सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे… कोरोनाच्या अगदी सुरुवातीपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांपर्यंत झाडून सगळ्यांनी कोरोनापासून बचावासाठी या त्रिसूत्रीचा कंठरवाने उल्लेख केला आहे. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही, तोपर्यंत याच त्रिसूत्रीच्या जोरावर कोरोनाचा पराभव शक्य आहे हे वारंवार आणि वेळोवेळी जनतेच्या मानवर ठसवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे कोरोनाची लस किंवा ही त्रिसूत्री, याशिवाय कोरोनापासून वाचण्याचा तिसरा कोणताही मार्ग किंवा उपाय नाही, याबद्दल सामान्यांच्या मनात अजिबात शंका उरली नाही. प्रत्येकजण एक तर लसीची वाट पाहू लागला किंवा त्रिसूत्रीचं पालन करण्याचा प्रयत्न करू लागला. सरकारकडूनही आपत्कालीन कायद्यांतर्गत कारवाईची भीती घातली जाऊ लागली. पण या दोन्ही उपायांखेरीज, कोरोनाला लांब ठेवण्याचा अजून एक उपाय आहे हे सामान्यांपासून लपवलं गेलं आहे. त्याचा साक्षात्कार आता सामान्यांना होऊ लागला आहे. कारण हा कोरोना लाचखोर आहे!

हे वाचून खरंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय भलतंच. एक डोळ्यांनाही न दिसणारा विषाणू लाच कशी घेऊ शकेल? पण सत्ताधारी, विरोधक, प्रशासक अशा सगळ्याच नेतेमंडळी आणि अधिकार्‍यांच्या वर्तनातून तरी हेच दिसून येत आहे. कोरोना जर लाच घेत नसता, तर या मंडळींचे मोठमोठाले भारंभार गर्दीचे कार्यक्रम बिनबोभाटपणे पार पडते ना! त्यामुळे या सर्व मंडळींनी कोरोनाला नक्कीच लाच दिली असणार! त्यामुळेच यांनी सगळे नियम मोडले जरी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जरी, मास्क घालणं टाळलं जरी किंवा वेळोवेळी हात धुण्याचा त्यांना विसर पडला जरी, तरी कोरोना काही त्यांच्या जवळदेखील फिरकायचा नाही, याची त्यांना निश्चितपणे खात्री असणार!

२२ डिसेंबरपासून राज्यभरातल्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला. त्याच्याच दोन दिवस आधी पुण्यात एक जंगी विवाह सोहळा पार पडला. आणि हे लग्न होतं भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं. पुण्याच्या शुभारंभ लॉन्समध्ये संध्याकाळच्या वेळी हा सोहळा पार पडला. खरंतर सरकारी नियमानुसार लग्नसमारंभात जास्तीत जास्त २०० लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून. सामान्य माणसांच्या लग्नकार्यात या नियमांचे दाखले देऊन कारवाया केल्या जात असताना आणि अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल केले जात असताना केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या एका आमदाराचा असा जंगी सोहळा अगदी बिनबोभाटपणे पार पडू शकतो, हे सगळ्या जनतेनं पाहिलं.

विशेष म्हणजे या सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हजर होते. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, हर्षवर्धन पाटील, गिरीश बापट, सुभाष देशमुख, निलेश राणे असे अनेक भाजपचे ज्येष्ठ-श्रेष्ठ-वरीष्ठ नेतेमंडळी हजर होते. कोरोनावरच्या उपाययोजनांबद्दल राज्य सरकार किती बेजबाबदारपणे वागत आहे या मुद्द्यावरून लागोपाठ पत्रकार परिषदा घेऊन टीका करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या लग्नात मास्क न लावता गर्दीमध्ये वधूवरांसोबत फोटो काढत अत्यंत ’जबाबदार’ वर्तन करताना दिसले!

बरं आपण अशा पद्धतीने परवानगी नसताना आपण गर्दी करून, सगळ्या नियमांची दारू करून फटाक्यांमध्ये उडवून दिलेली असताना त्याचं जाहीर प्रमोशन करण्यात देखील ही मंडळी मागे हटली नाही. त्यामुळे त्यांनी तोडलेल्या नियमांचे पुरावे त्यांनी स्वत:च ट्वीटरवर टाकले आहेत. लग्नानंतर चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी विनामास्क काढलेले फोटोच ट्वीटरवर शेअर केले आहेत!

विरोधकांनी अशा प्रकारे ‘भरीव’ लग्नसोहळ्यामध्ये जाहीरपणे कोरोनाला फुटबॉलसारखं लाथेनं उडवून लावल्यानंतर सत्ताधार्‍यांकडून किमान शहाणपणाची अपेक्षा होती. कारण शेवटी कोरोना काळात सामान्य जनतेने पाळायचे एकूण एक नियम सत्ताधार्‍यांनीच बनवले होते. त्यामुळे त्यांच्याकडून ‘जबाबदार’ वर्तन पाळलं जाईल असं वाटत असतानाच नाशिकमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा याहून जंगी लग्नसोहळा शहरातल्या बालाजी लॉन्समध्ये 4 जानेवारीला पार पडला. हे आमदार होते दिलीप बनकर. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याच गोटातले समजले जाणार्‍या दिलीप बनकर यांचं लग्न म्हटल्यावर अजित पवारांची त्यासाठी उपस्थिती अनिवार्यच होती. त्यांच्यासोबत नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकप्रतिनिधी मंडळी या लग्नाच्या गर्दीत शक्य तितकी भर घालण्यासाठी हजर होती. इतकंच नाही, तर ज्यांच्यावर सरकारचे निर्णय लागू करण्याची जबाबदारी असते, ते मोठमोठे प्रशासकीय अधिकारी देखील या लग्नाला ‘जबाबदारी’ने हजर होते! सगळ्या विशेष बाब म्हणजे हजारोंच्या गर्दीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्यावर नंतर राम सातपुतेंच्या लग्नाचे फोटो लाईक आणि शेअर करणार्‍या भाजपने टीका केली! नियम मोडण्यात देखील ‘तुम्ही शेर तर आम्ही सव्वाशेर’, असंच सत्ताधार्‍यांनी ठरवलं होतं की काय? असा प्रश्न या लग्नाच्या निमित्ताने नाशिककरांना पडला असावा!

या लग्नाच्या ५ ते ६ दिवस आधीच नाशिक मध्यच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर एका समस्येबाबत पोलीस स्थानकावर १० ते १२ महिलांना घेऊन गर्दी केली म्हणून त्यांच्याविरोधात आपातकालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण तोच कायदा या लग्नासाठी लागू करण्यासाठी मात्र नाशिकचे पोलीस आयुक्त आणि नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्यामध्ये टेनिस कोर्टचा सामना रंगला आहे. कारवाई तर सोडा, पण या घटनेवर भाष्य कोण करणार, यावरून देखोली दोघांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे. पुण्यात झालेल्या लग्नसोहळ्यावर पुणेकरांनीच आवाज उठवल्यानंतर तातडीने पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले. पण लग्नाला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.

या दोन घटना फक्त प्रातिनिधिक म्हणता येतील अशा आहेत. आपल्या आसपास अजूनही बड्या धेंडांची प्रचंड गर्दी असलेली लग्नकार्य, पक्षप्रवेशाचे कार्यक्रम, निवडणुकांच्या प्रचारसभा, जाहीर सभा आणि इतर अनेक कार्यक्रम बिनबोभाटपणे पार पडत आहेत. मात्र, केवळ काही ‘कनेक्शन्स’च्या जोरावर नियम पायदळी तुडवून असे कार्यक्रम घेण्याचं धारिष्ठ्य या नेतेमंडळी आणि त्यांच्या लागेबांध्यांमध्ये येत आहे. पण दुसरीकडे सामान्यांना मात्र कायम मानेवर नियमांची टांगती तलवार ठेऊनच वावरावं लागत आहे. त्यामुळे इतर बाबतीत कायम पडणारा प्रश्न कोरोनासारख्या महाभयंकर जीवघेण्या विषाणूचा सामना करताना देखील आता पडू लागला आहे. सर्व नियम आणि बंधनं फक्त सामान्यांसाठीच आहेत का? किंवा सर्व नियम आणि बंधनं फक्त सामान्यांसाठीच का आहेत? आणि या दोन्ही प्रश्नांसाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसोबतच प्रशासन देखील तितकंच उत्तरदायी आहे. दिल्लीत झालेल्या तबलिगींच्या कार्यक्रमातून कोरोना पसरल्याचा कांगावा करत रान उठवणारी मंडळी आता का चिडीचूप बसली आहेत? मुंबईत सर्वांसाठी लोकल सुरू न करण्यासाठी गर्दीमुळे कोरोना वाढण्याचं कारण देणारे सत्ताधारी अशा कार्यक्रमांचा पत्ता कोरोनाला माहितीच नसतो अशा आविर्भावात का वागत आहेत? कोरोनावरून सरकारचा पिच्छा पुरवणारे विरोधक अशा कार्यक्रमांमध्ये हारतुरे आणि गळाभेट का स्वीकारत आहेत?

खरंतर सामान्यांना गृहीत धरण्याची वृत्ती काही आजची नाही. तसंच, एका विशिष्ट वर्गाला नियमांमधून मोकळीक देण्याचे प्रकार देखील नवे नाहीत. पण किमान कोरोनासारख्या भीषण प्रकाराचं गांभीर्य ठेऊन तरी या मंडळींनी जबाबदारीचं भान ठेवायला हवं. आणि अशा बेजबाबदार वर्तनावर करडी नजर ठेऊन त्याला वेळीच आवर घालण्याच्या कर्तव्याचा प्रशासनाला विसर पडता कामा नये. तो जर पडला, तर पैशाने सारंकाही विकत घेता येतं, या सूत्रावरचा सामान्यांचा भरवसा अधिकच दृढ होईल. आणि या बड्या धेंडांनी कोरोनालाही लाच देऊन खरेदी केलंय की काय? असा प्रश्न ते विचारू लागतील! त्याचंही उत्तर मिळणार नाही, हेही गृहीतच!


काँग्रेसची ‘शिवसेना स्टाईल’!




‘आम्ही ठणकावून सांगतो’…‘भान बाळगावे’…‘आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही’…‘कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही’… काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याच मित्रपक्षाला सुनावलेले हे खडे बोल! खरंतर हे किंवा अशा प्रकारचे आक्रमक शब्द कायम शिवसेना नेत्यांच्या, पदाधिकार्‍यांच्या, कार्यकर्त्यांच्या बोलण्यात ऐकण्याची महाराष्ट्राच्या जनतेला सवय लागली आहे. त्यानंतर हा वसा कौटुंबिक वारशामधून राज ठाकरेंकडेही आला. त्यामुळे त्यांच्याही भाषणांमध्ये अशा प्रकारचा आक्रमकपण दिसू लागला. पण महाराष्ट्र काँग्रेसकडून गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारचा आक्रमकपणा दाखवल्याचं दिसत नव्हतं. विरोधकांना ‘ठणकावून’ सांगण्याच्या भानगडीत काँग्रेसजन फारसे पडत नसत. त्यापेक्षा रीतसर निषेध करण्यावरच त्यांचा भर असे. पण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र काँग्रेसकडून ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली जाऊ लागली आहे, आणि विशेष म्हणजे आपल्याच सत्तेतल्या मित्रपक्षाविरूद्ध ही आक्रमक भूमिका घेतली जाऊ लागल्यामुळे हा माध्यमांसाठी चर्चेचा, सत्ताधार्‍यांसाठी चिंतेचा आणि भाजपसाठी राजकारणाचा विषय झाला आहे.

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं, असा अट्टाहास शिवसेनेनं लावून धरला आहे. नव्हे, सुरुवातीपासूनच शिवसेनेची तीच भूमिका राहिली आहे. अगदी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याआधीपासून. त्यामुळे काँग्रेसला शिवसेनेची ही भूमिका माहिती नसण्याचं काहीही कारण नाही. शिवाय इतकी वर्षे औरंगाबादमध्ये याच मुद्यावरून राजकारण पेटवणार्‍या शिवसेनेसमोर काँग्रेसनंही दोन हात केलेच आहेत. त्यामुळे आत्ताच हा मुद्दा का पेटवला जातोय? यासोबतच काँग्रेसकडून आत्ताच या मुद्याचं राजकारण का केलं जातंय? हा देखील मुद्दा चर्चेचा ठरू लागला आहे. विशेषत: बाळासाहेब थोरात यांच्याकडून या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली जाऊ लागली आहे. कधी ट्वीटरच्या माध्यमातून तर कधी थेट प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेला विरोध करण्यात बाळासाहेब थोरात अजिबात मागे हटत नाहीत.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिले ६ ते ७ महिने शिवसेनेसोबत शांततेत संसार करणार्‍या काँग्रेसनं पहिला आरोप केला तो काँग्रेसला सत्तेत समान स्थान आणि निर्णय प्रक्रियेत योग्य महत्त्व मिळत नसल्याचा. तेव्हा देखील बाळासाहेब थोरातांनी थेट प्रसार माध्यमांमध्येच हे आरोप करून मुख्यमंत्री आणि सत्ताधार्‍यांना अडचणीत आणलं होतं. हे प्रकरण तर थेट दिल्ली हायकमांडपर्यंत देखील पोहोचलं होतं. आता पुन्हा एकदा काँग्रेसनं शिवसेनेच्या विरुद्ध भूमिका घेतली असून यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचीदेखील साथ आहे!

बाळासाहेब थोरातांनी यावेळी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून खुलं पत्रच त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये भाजपला कानपिचक्या देताना त्यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. ‘केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणार्‍यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही’, अशा शब्दात बाळासाहेब थोरातांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

बाळासाहेब थोरातांनी लिहिलेलं हे खुलं पत्र काही क्षणांसाठी कुणाला ‘सामना’चा अग्रलेख वाटल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही! कारण यातली भाषा ही काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या राजकीय पद्धतीला साधर्म्य सांगणारी वाटत नाही. पण मग काँग्रेस आत्ताच इतकी आक्रमक का झालीये? की औरंगाबाद पालिका निवडणुका आणि मुंबई पालिकेसोबतच राज्यातील इतर पालिका निवडणुकांमध्ये आपलं वजन आणि व्होटबँक वाढवण्यासाठी काँग्रेसकडून अशा प्रकारे विरोध केला जातोय? या प्रश्नावर व्यापक चर्चा होऊ शकते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे एखाद्या शहराचं नाव धार्मिक किंवा ऐतिहासिक संदर्भातले दाखले देऊन बदलणं हे काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर सर्वच प्रकारच्या मतदारांशी जुळवून घेताना परवडणार नाही. विशेषत: भाजपच्या विरोधात काँग्रेसला आपला ‘धर्मनिरपेक्ष’ चेहरा जपणं नितांत आवश्यक आहे. अशात काँग्रेसनं या मुद्याला विरोध करणं साहजिक वाटू शकतं. पण त्याचसोबत अशा मुद्यांमुळे सत्तेतून बाहेर पडण्यापर्यंत ताणतणाव निर्माण होऊ देणं देखील काँग्रेसला नक्कीच परवडणारं नाही. कारण सत्तेत सहभागी असल्यामुळेच काँग्रेसला राज्यात पुन्हा हातपाय पसरण्याची आणि पक्ष वाढवण्याची चांगली संधी मिळू शकणार आहे. हे काँग्रेसच्या धुरिणांना माहिती नसावं, असं अजिबात वाटण्याचं कारण नाही.

बाळासाहेब थोरात गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेविरोधात जाहीर भूमिका घेऊन आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची निवडणूक देखील कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काँग्रेसला राज्यामध्ये आता आक्रमक चेहरा हवा आहे. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील निवड होताच ‘२०२२ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार’ असल्याची घोषणा करून टाकली आहे. त्यामुळे राज्यात आक्रमकपणे पक्षवाढ करण्यासाठी काँग्रेसकडून पावलं टाकली जात आहेत हे स्पष्ट आहे. आणि त्यात चुकीचंही काही नाही. कारण आघाडीत असला, तरी प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:चा विस्तार करण्याचा नक्कीच अधिकार आहे. मात्र, आपण घेतलेली भूमिका आपल्यालाच मारक ठरणार तर नाही ना, याचा देखील काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वानं विचार करणं आवश्यक आहे. बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातला काँग्रेसचा आक्रमक चेहरा होण्याचा प्रयत्न करत असले, तरी यातून हातची सत्ता गेली, तर त्याचे राजकीय परिणाम काँग्रेसला भोगावे लागू शकतात. विशेषत: राज्यात काँग्रेसचे इतरही अनेक आक्रमक नेते असताना या मुद्यावरून फक्त थोरातच अशा प्रकारे आक्रमक झालेले दिसणं नक्कीच खटकणारं आहे!

खरंतर औरंगाबादचा विकास हा विषय कुणीही नाकारू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये औरंगाबादकरांनी सर्वच पक्षांना सत्ता देऊन पाहिली आहे. आणि त्या सर्वांनी त्यांचा भ्रमनिरासच केला आहे. सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी औरंगाबादमधून निवडून विधिमंडळावर आणि देशाच्या संसदेतदेखील गेले आहेत. मात्र, तरीदेखील औरंगाबादकरांना मात्र अपेक्षित विकासानं हुलकावणीच दिली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी केलेली औरंगाबादच्या विकासाची मागणी योग्यच आहे. पण त्यासाठी नामांतराला विरोध करणं तर्काला पटत नाही. खरंतर इथे थोरातांनी काँग्रेसच्या देशपातळीवरच्या प्रतिमेला आणि विचारसरणीला ते पटत नाही म्हणून विरोध करतोय, इतकंच सांगितलं असतं, तरी चाललं असतं. पण त्याहीपुढे जाऊन त्यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी औरंगाबादमध्ये विकास होत नसताना नाव बदलण्याऐवजी विकासावर लक्ष केंद्रित करावं, असा सल्ला दिला. आता औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं तर तिथे विकासच होणार नाही का? असा प्रश्न कुणी बाळासाहेबांना विचारला, तर त्याचं त्यांच्याकडे काय उत्तर असेल?

खरंतर, बाळासाहेब थोरातांचा असा आक्रमक विरोध पाहिला की भाजप-शिवसेनेची सत्ता असताना शिवसेना ज्या पद्धतीने विरोध करत होती, त्याची आठवण होते. खुद्द विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे राज्यात युतीचं सरकार असताना प्रत्यक्ष किंवा सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर आणि भाजपच्या निर्णयांवर थेट प्रहार करताना दिसत होते. तेव्हाही शिवसेना सत्तेत असली, तरी जनतेच्या भल्याची आणि विकासाची भूमिका मांडत असल्याचं सांगून आपल्याच सरकारवर टीका करत होती. आता शिवसेनेलाच काँग्रेसच्या रुपानं त्यांच्याच भूमिकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही ‘शिवसेना स्टाईल’ आता शिवसेनेचं नेतृत्व कसं हाताळतं, यावर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून असेल, असं म्हणायला हरकत नाही!